कृषिकिंग, वाराणसी: उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यातील कचनार गावात १४ जुलै २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. या सभेसाठी १० एकर जमीनवरील उभे पीक नष्ट करण्यात आले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पीक असल्यामुळे सुरवातीला विरोध केला होता. मात्र, नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगून, वाराणसीमधील कचनार येथील सभेसाठी तीन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर समोरच भव्य व्यासपीठ उभारण्यात आला होता. येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगींची विशेष सोय करण्यात आली होती. यासाठी परिसरातील सात शेतकऱ्यांच्या जमिनाचा वापर करण्यात आला होता. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी अनकेदा प्रशासनाकडे लेखी तक्रार करूनही काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले आहेत.