हरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. राजस्थाननंतर लागवडीमध्ये महाराष्ट्राचा क्रम लागतो. या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी व चारा पीक म्हणूनही लागवड करता येते. खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – १ या लेखात आपण या पिकांसाठी व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेऊया.
जमीन व हवामान –
- मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते.
- चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन कडधान्य लागवडीसाठी वापरू नये.
- तूर या पिकास 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान या पिकास अधिक उपयुक्त असते.
पूर्वमशागत –
तूर पिकाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी करून वरवरच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी पाट टन चांगले कुजलेले कंपोस्ट खत/ शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन –
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धक तूर बियाण्यासाठी 250 ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धक गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
खते –
पिकाच्या सुरवातीच्या काळात नत्राची गरज भागविण्यासाठी तूर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डायअमोनिअम फॉस्फेट (डीएपी) अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरी द्यावे. प्रति हेक्टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.
आंतरमशागत –
- पीक सुरवातीपासूनच तणविरहित ठेवावे.
- कोळप्याच्या साहाय्याने पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहून पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी.
- मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा. त्यासाठी पेंडीमिथॅलीन हे तणनाशक हेक्टरी तीन लिटर 500 ते 700 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारून वरवर पाळी घालावी. ते जमिनीत चांगले मिसळले जाऊन तणनियंत्रण अधिक प्रभावी होते.
आंतरपीक –
एक ओळ तुरीनंतर तीन ओळी सोयाबीन या पिकांच्या घेतल्या, तर तुरीचे सरासरी 1.5 टन हेक्टरी उत्पादन हाती येते. सोयाबीनचे दोन टनांपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
या लेखाच्या पुढील भागात आपण पाणी व्याव्स्थापन, रोग आणि कीड नियंत्रण यासारख्या पैलूंचा आढावा घेऊया.