आम्ही कास्तकार, मुंबई: “राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकार केवळ तोंडदेखल्या उपाययोजना करीत असल्याचा आरोप करत दुष्काळग्रस्तांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागांना १ लाख रूपयांचे अनुदान देण्यात यावे, जुने पीककर्ज माफ करण्यात यावे,” अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राज्यातील दुष्काळ, लोकसभा निवडणुकीचा आढावा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी टिळक भवन येथे प्रमुख काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत याबाबत मागणी केली आहे.
पुढील हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची मदत करावी, यापूर्वी सरकारने जाहीर केलेली सर्व नुकसान भरपाई आणि अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सर्व कृषीपंपांचे थकीत बील माफ करावे, चारा छावणीत एका शेतकऱ्यांची कमाल पाच जनावरे घेण्याची अट रद्द करावी आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कासह सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क तातडीने माफ करावे. अशा मागण्या काँग्रेसकडून यावेळी करण्यात आल्या आहेत.
व्हिडिओ :