[ad_1]
पुणे | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना चाल मिळाली आहे. त्यामुळे उद्या (११ जून) महाराष्ट्राच्या काही भागासह गोव्यात मान्सूनचे आगमन होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्यभागातील कमी दाब क्षेत्राची स्थिती पाहता गोव्यासह तळकोकणात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने तयार केलेल्या स्थितीमुळे देखील केरळात वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने केरळसह कर्नाटकची किनारपट्टी व्यापलेली आहे. त्यामुळे आता गोवा आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.
मान्सूनने रविवारी (७ जून) तामिळनाडूचा बहुतांशी भाग, दक्षिण कर्नाटकचा काही भाग, रॉयलसिमा या भागात मुसंडी मारली आहे. तर कर्नाटकातील कारवार, सिमोघा, तुमकुर, आंध्रप्रदेशातील चित्तूर आणि तामिळनाडूतील चेन्नईपर्यंत वाटचाल केली आहे. बंगालच्या उपसागारातील सध्याची स्थिती आणि गतीविधी वाढल्याने उपसागराच्या काही भागासह पूर्वभारतीय राज्ये, तसेच मध्य महाराष्ट्र आणि तेलगंणा, सिक्किम, पश्चिम बंगाल, कोकण आणि गोव्यात (११ जून) पूर्ण क्षमतेने मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
या आठवड्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बातमी असून दक्षिण-पश्चिम मॉन्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध दाखल होत आहे. ८ जून ते १४ जून या दरम्यानची हवामानाची स्थिती विचारात घेता महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा राज्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. विदर्भात देखील पावसाने शेतकऱ्यांना चांगली सलामी दिली आहे. तर आता महाराष्ट्राच्या समुद्रकिनार पट्टीभागत येणाऱ्या दोन-तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ११ जून रोजी पावसाची गतिविधी वाढणार आहे. तर दुसरीकडे मुंबईसहित रत्नागिरी, महाबळेश्वर, ठाणे, पालघर, कोल्हापूरचा पश्चिम भाग यामध्ये १२ ते १४ जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान मुंबई, पुणे सहित कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेवर मान्सूनचे आगमन आणि चांगला पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणार आहे. चांगल्या पावसामुळे खरीपाची पेरणी वेळेवर होऊन त्याचा पिकास फायदा होण्याचा अंदाज आहे.
कोकणात निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावित भागातील शेतकऱ्यांनी शेतात साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत. जास्ती पाणी साचलेल्या भागातील झाड-रोपे काढून वेगळी करावीत, तसेच सध्याची पावसाची स्थिती पाहता भाताची रोपवाटिका तयार करून घ्यावी. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी बंधूनी देखील शेत तयार करून घ्यावे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन याचे बियाणे प्रमाणित कृषिसेवा केंद्रावरूनच करावी. मातीचा प्रकार, हवामानाची स्थिती, पाण्याची उपलब्धता पाहूनच पुढील निर्णय घ्यावेत. विदर्भातील शेतकऱ्यांनी भूईमूग आणि सूर्यफूलाची काढणी करून घ्यावी. आणि खरीपासाठी कापूस, सोयाबीन तसेच इतर पिकांसाठी जमीन तयार करून घ्यावी.
Info Source – IMD, Skymate weather
[ad_2]
Source link