[ad_1]
पुणेः ऐन उन्हाळ्यात राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आतापर्यंत २६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. १८ ते २१ मार्च या चार दिवसांमध्ये राज्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये पिकांना फटका बसला आहे.
अमरावती, नागपूर, बुलडाणा, नाशिक, जळगाव आणि अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे सांगितले जात आहे.
या जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर व चंद्रपूर भागात गारपिटीमुळे कमी नुकसान झाले आहे. बहुतेक जिल्ह्यात काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकाचेच नुकसान मोठया प्रमाणात झालेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
१८ ते २१ मार्च या चार दिवसांमध्ये राज्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या भागात अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह काही गावांमध्ये तुफान गारपीट झालेली आहे.
नुकसानीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे प्राथमिक अहवाल गेलेले आहेत.
मात्र, पंचनामे झालेले नसल्याने निश्चित किती नुकसान झाल्याचा याचा अंदाज महसूल आणि कृषी या दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांना आलेला नाही.
गहू, हरभऱ्याशिवाय अमरावतीत संत्रा तर बुलडाणा भागात केशर आंब्याची हानी झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य शासनाने अद्याप पंचनामा करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
कारण, कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने झालेल्या पंचनाम्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाते.
अशी मिळू शकते मदत
गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे झालेच तर दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी सध्याच्या नियमाप्रमाणे प्रतिहेक्टरी ६८०० तर बागायती क्षेत्रासाठी १३५००रुपये मिळू शकतील. तसेच, आंबा, संत्री, द्राक्ष उत्पादक पट्ट्यात नुकसान असल्यास हेक्टरी १८००० रुपये मिळू शकतील.
भाजीपाल्याचे मोठे नुकसान
गारपिटीमुळे भाजीपाला पिकाचे झालेले नुकसान ५० हजार हेक्टरच्याही पुढे आहे. मात्र, सर्वत्र पंचनामे वेळेत होत नसल्याने शेतकरी देखील पुढच्या तयारील लागतात.
चालू गारपिटीत काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यात अर्धा तास गारा पडल्या. काही ठिकाणी त्या बोराच्या आकाराच्या होत्या. त्यामुळे नुकसान मोठे होते, असे महसूल विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
[ad_2]