शेतकरी विक्रम कोल्हे यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सरासरी ५० किलो वजनाच्या २९ गोण्या मोठा कांदा, २१ गोण्या लहान कांदा याशिवाय अन्य ३ गोण्या असा एकूण ५३ गोण्या कांदा विक्रीस आणला होता. त्यात त्यांच्या मोठ्या कांद्याला १०० रुपये प्रति क्विंटल (१ रुपये प्रतिकिलो), लहान कांद्याला ५० रुपये प्रति क्विंटल (५० पैसे प्रतिकिलो) तर उर्वरित ३ गोण्यांना २०० रुपये प्रति क्विंटल (२ रुपये प्रति किलो) असा दर मिळाला. दर आणि वजन याप्रमाणे आकडेमोड करता त्यांना एकूण २०८७ रुपये मिळाले. त्यातून हमाली, तोलाई, मोटर भाडे आणि अन्य बाबींसाठी झालेला २४३० रुपये खर्च वजा करता त्यांना वजा ३४३ रुपये मिळाले. अर्थात त्यांना आपल्या खिशातून पैसे द्यावे लागले.
दरम्यान, कांद्याचे आगार म्हणवल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील शेतकऱ्याने १०५ रुपये प्रति क्विंटल विकला गेला, म्हणून भर चौकात ट्रॅक्टरभर कांदा ओतून दिल्याची घटना
काल समोर आली होती. तर याच आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समितीत अशीच एक घटना समोर आली होती. संगमनेर येथील शेतकऱ्याला १२ गोण्या कांदा विक्रीतून अवघे ५० रुपये मिळाल्याचे समोर आले होते. आज जे चलन अस्तित्वातच नाही अशा चलनात कांद्याची खरेदी सुरु आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही एकप्रकारे थट्टाच म्हणावी लागेल.